दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली पुणे ता.9 अलीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. यापुढील काळात पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाही, असा इशारा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिला.
ज्येष्ठ पत्रकार शामराव दौंडकर यांनी लिहिलेल्या ‘ धडपड ‘ या पुस्तकाचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते झाले. पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास ऍड. अमरसिंह जाधवराव, ज्ञानेश्वर भोईटे, पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले अलीकडच्या काळात माध्यमावर हल्ले वाढले आहेत. श्रमिक पत्रकार संघाला वेगळे वलय आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. या चौथ्या स्तंभावर जाणीवपूर्वक हल्ले सुरू आहेत. ही परंपरा महाराष्ट्राला शोभणारी नाही. कोकणात पत्रकाराची हत्या झाली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला जात आहे. एक नेता सातत्याने HMV पत्रकार, चाय बिस्कीट पत्रकार अशी जाहीर वल्गना करत आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकाराला शाई फेकीच्या गुन्ह्यात गोवले गेले. पत्रकारांनी एकजूट केल्यावर त्या पत्रकाराला गुन्ह्यातून वगळले गेले. सुसंस्कृत महाराष्ट्रात हा प्रकार एक शोकांतिका आहे. असे हिंसक प्रकार थांबले पाहिजेत. यासाठी सगळ्यांनी एकजूट करण्याची गरज आहे. म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये. यापुढे पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाही.
पुस्तकाबाबत बोलताना पवार म्हणाले शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लोकांची गाथा *धडपड* मधून मांडली आहे. मी 32 वर्षापासून राजकीय जीवनात असून तेव्हापासून तात्या या क्षेत्रात आहे. विविध क्षेत्रांतील व्यक्तींचे अल्पचरित्रातून मांडल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे.
अलीकडे माहिती न घेता ज्या बातम्या येतात त्यामुळे मनाला वेदना होतात. तब्येत बरी नसल्याने विश्रांती घ्यावी लागते. परंतु ध चा मा केला जातो. असा संताप दादांनी व्यक्त केला.