दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-अनिल पाटणकर
पुणे : प्रस्तावित बालभारती ते पौंड फाटा या रस्त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशा भ्रमात असलेल्या प्रशासनाने वेताळ टेकडी तोडण्याचा विचार करणे हे दुर्दैवी असुन त्याला पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून दिवसेंदिवस विरोध वाढत चालला आहे.या निर्णयाबाबत आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ‘वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी वेताळ टेकडी तोडण्याची आवश्यकता नसून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करणे आवश्यक आहे.तसेच भविष्यात पाणीटंचाईपासून वाचायचे असल्यास पुणेकर नागरिकांनी एकजूट होऊन आवाज उठवणे ही काळाची गरज आहे.असा सूर उमटला. वेताळ टेकडी बचाव कृती समिती आणि लोकायत यांच्या वतीने “वेताळ टेकडी वाचवा, पुणे वाचवा” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
या चर्चासत्रात वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या समन्वयक डॉ. सुषमा दाते म्हणाल्या की, टेकडी फोडण्याची जी कारणे दिली जात आहेत त्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर लक्षात येते की, ज्यासाठी टेकडी फोडायची आहे त्यामुळे वाहनांचा फेरा विशेष कमी होणार नाही. मात्र पर्यावरणाची हानी जसं की १८०० झाडं तोडण्यात येतील असं म्हटलं जातअसले तरी प्रत्यक्षात २००० पेक्षा जास्त झाडे प्रास्ताविक प्रकल्पांतर्गत तोडली जातील त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या पशुपक्ष्यांचे जीवन नष्ट होईल. त्यामुळे याला सर्व स्तरातून विरोध होणेच आवश्यक आहे. कन्सल्टिंग इंजिनियर असलेले प्रदीप घुमरे म्हणाले की, या निर्णयामुळे केवळ वेताळ टेकडी परिसरावरच परिणाम होणार नाही तर बाणेर,पाषाण,कोथरूड,भांबुर्डा,शिवाजीनगर,गोखलेनगर,जनवाडी, एरंडवणे या सर्व परिसरांच्या भूमिगत पाणी स्त्रोत्रांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन, पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. या टेकडीवर पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत ते नष्ट तर होतीलच पण वर्षानुवर्षेचे अगदी तळातला भूमिगत पाणी साठा पुन्हा तयार व्हायला शेकडो वर्षे लागली असतील तो सर्व साठा नष्ट होईल.
चर्चासत्रात बोलताना सामाजिक कार्यकर्ते रुशल हीना म्हणाले की, वाहतूक कोंडीवर जगभर जे उपाय योजले गेले भारतात-पुण्यात त्याची पुनरावृत्ती होत असून मूळ समस्या वेगळी आहे. याकडे त्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. मुळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था डळमळीत करून कार इंडस्ट्री, सिमेंट इंडस्ट्री आणि बिल्डर लॉबी यांच्या फायद्यासाठी सर्व धोरणं राबवली जात आहेत. पुण्यातल्या दरवर्षी जवळपास ३ लाख वाहने रस्त्यावर येतात. एक लाख लोकसंख्येमागे केवळ १ बस असून साधारणतः ३००० बसेसची आवश्यकता असताना केवळ चांगल्या चालू स्थितीतील केवळ १६०० बसेस रस्तावर धावतात, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे, सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन देणे,वाहन फ्री रस्ता करणे, वाहन कर लावणे यातून ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे शक्य आहे. जगात अमस्टरडम, बोगोटा, बुडापेस्ट यासारख्या अनेक देशातील अनेक शहरामध्ये वरील उपाय लागू करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट केली आहे. आता श्वासावाटे तेथील जनता गाड्यांचा धूरवजा विष घेत नसून मोकळा श्वास घेत आहे. रस्ते अपघात शून्यावर आले आहेत. केवळ जनतेची चेतना असेल तर हे नक्कीच होऊ शकते.
या चर्चासत्रात खासदार वंदना चव्हाण, ज्येष्ठ लेखक मिलिंद बोकील, कॉंग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट, नदी सुधार समितीचे कार्यकर्ते सारंग यादवाडकर आदी मान्यवरांसह पुणेकर पर्यावरणप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.