दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी – वसंत खडसे
👉उद्या रिसोड येथे भाजपची संकल्प सभा.
👉 जिल्हावासियांची उत्सुकता शिगेला.
👉 २५ वर्षा नंतरही जिल्ह्याचा विकास बॅकफूटवरच.
👉 मा. खासदार अनंतराव देशमुख यांच्या कडून जिल्हावासियांना अनेक अपेक्षा.
वाशिम : जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावी नेते म्हणून ओळखल्या जाणारे माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या भाजप प्रवेशानंतर, प्रथमच भाजपाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात येत आहेत. त्या अनुषंगाने रिसोड येथे आज भाजपाची संकल्प सभा होणार आहे सदर सभेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खासदार संजय धोत्रे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार आहे, वाशिम जिल्ह्याच्या निर्मितीला आजमितीस जवळपास २५ वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा जिल्हा विविध विकासात्मक कामाच्या दृष्टीने बॅक फुटवरच असल्याचे चित्र आहे. संकल्प सभेत संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या विकासासाठी कोणता संकल्प सोडणार..? या प्रश्नाकडे जिल्हावासीयासह रिसोड तालुक्यातील संपूर्ण जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, विदर्भातील कणखर नेतृत्व असलेले नेते देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी नक्कीच मोठी घोषणा करतील अशी अपेक्षा जिल्हावासी व्यक्त करीत आहेत.
वाशिम जिल्हा निर्मितीला जवळपास 25 वर्षाचा कालावधी लोटला असून आजही अनेक विभागाच्या जिल्हा मुख्यालयाची निर्मिती झाली नाही. वाशीम येथे स्थापन होणाऱ्या उपविद्यापीठाचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आला नाही. शिवाय वाशिम~ जालना रेल्वे मार्गाची अनेक वर्षापासून जिल्हावाशीयांच्या मागणी बाबत आजपर्यंत कोणत्याही सरकारने अजून तरी ठोस घोषणा केली नाही. याबाबत डबल इंजिन असलेल्या शिंदे~ फडणवीस सरकारकडून काहीतरी ठोस पाऊल उचलल्या जाईल, अशी अपेक्षा सहाजिकच सर्वसामान्यांना लागली आहे. जिल्ह्यातील अनेक उपबाजार बंद अवस्थेत असल्याने मुख्य बाजारपेठेपासून दूरवर असलेल्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे, परिणामी नाहकचा आर्थिक भुर्दंड सुद्धा सोसावा लागत आहे.
रिसोड तालुक्यातील समस्या 👇
रिसोड तालुक्यातील अनेक समस्यांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागाला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर होऊन सुद्धा अद्याप पर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही. तालुक्यातील शेलु खडसे येथील मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत येणाऱ्या लघु पाटबंधारे तलावाच्या कामाला मंजुरात मिळून देखील, प्रत्यक्षात मात्र कामाला सुरुवात झाली नाही. तालुक्यातून जाणारा अनेक खेडेगावांना मुख्य बाजारपेठेशी जोडणारा मोरगव्हाण~ शेलु खडसे~ मोठेगाव वरून गोवर्धनला जोडणारा प्रमुख जिल्हा मार्गाचे काम आजही अर्धवट अवस्थेत पडून आहे. यासह अनेक समस्यांचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत असून, या गंभीर समस्यांचा पाठपुरावा जिल्ह्यातील कर्तुत्ववान नेते म्हणून ओळख असणारे माजी खासदार अनंतराव देशमुख हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करतील अशी अपेक्षा संकल्प सभेच्या निमित्ताने रिसोड तालुक्यातील सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.