दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी -शितल रमेश पंडोरे
——————————————————
गारपीटग्रस्तांना केवळ विमा भरपाईच्या भरवशावर टोलवू नका. त्यांना एकरी १ लाख रुपयांची मदत द्या, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. सरकारी यंत्रणा चाकोरीत ठरवल्यानुसार का होईना काम करत आहे, पण सरकार शेतकऱ्यांना मनापासून मदत करत नाही, असाही दावा त्यांनी केला. दानवे यांनी नुकतीच बीड जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी दत्तात्रय शिंदे यांना तत्काळ विहीर आणि गाय गोठा मंजूर करा, असे निर्देश दानवे यांनी बीडीओ व तहसीलदार यांना दिले.
उद्धव ठाकरे यांच्याशी मोबाइलवरून संवादही घडवून आणला. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पूर्ण शक्तिनिशी आवाज उठवला जाईल, असे ठाकरे म्हणाले. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या मालकीच्या कारखान्यावर जीएसटीच्या पथकाने नुकताच छापा घातला. त्याविषयी नाराजी व्यक्त करत दानवे म्हणाले की, या छाप्यामागे काहीतरी षड्यंत्र आहे. केवळ पंकजा यांच्याच कारखान्यात गडबड आहे आणि इतर ठिकाणी आलबेल आहे, असे या सरकारचे म्हणणे आहे का?