दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आपल्या भारत राष्ट्र समिती पक्षाला राष्ट्रीय पातळीवर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून याची सुरुवात महाराष्ट्रापासून केली आहे. गेल्या काही दिवसांत मराठवाड्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. तर आणखी काही नेते पक्षाच्या संपर्कात आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरमधील काही नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी या नेत्यांसाठी खाजगी चार्टर्ड विमान पाठवले होते. त्यामुळे चार्टर्ड विमानाने प्रवास करणाऱ्या या नेत्यांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
नांदेड येथील सभेनंतर आज बीआरएस पक्षाची सभा छत्रपती संभाजीनगर शहरात येथे संध्याकाळी ६ वाजता शहरातील जाबिंदा मैदानावर होणार आहे. या सभेत स्वतः तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव उपस्थित राहणार आहे. दरम्यान यावेळी पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला असून यात ४० माजी नगरसेवक आणि माजी आमदार, खासदार यांचे प्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे याच सभेतून मुख्यमंत्री केसीआर काही राजकीय घोषणा देखील करणार असल्याचे वृत्त आहे. मात्र त्यापूर्वी संभाजीनगरमधील अनेक महत्त्वाच्या राजकीय नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे.
राजू शेट्टी यांना ऑफर देण्यात आली होती पण राजू शेट्टी यांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला त्या नंतर शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी देखील १९ एप्रिलला बीआरएसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, यावेळी माजी काँग्रेस नेते फेरोज पटेल यांच्यासह अनेक नेत्यांची देखील उपस्थिती होती, परंतु जयाजी सूर्यवंशी यांना छत्रपती संभाजीनगरमधून तेलंगणाला जाण्यासाठी आणि इतर नेत्यांना तेलंगणाहून संभाजीनगरला परत येण्यासाठी विशेष खाजगी चार्टर्ड विमानाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे या पक्षप्रवेशाची सध्या जोरदार चर्चा आहे.