दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर(प्रतिनिधी) : देगलूर तालुक्यातील येरगी येथे नुकतेच चालुक्यकालीन शिलालेख सापडल्यानंतर तेथे शासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत २६ एप्रिल रोज बुधवारी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली व गावकऱ्यांशी संवाद साधला. त्या प्रसंगी येरगीतील सर्व मंदिरे,बारवा यांचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. होट्टल च्या धर्तीवर, होट्टल येथे येणाऱ्या पर्यटकास केवळ होट्टलच नव्हे तर त्या आसपासची चालुक्य कालीन संपदा अनुभवता यावी या करिता पर्यटन सर्किट बनिवीने यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल आणि पुढच्या वर्षी होट्टल व येरगी असा एकत्रित महोत्सव साजरा करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले .
येरगी येथील दोन जिर्ण झालेल्या बारवांचे निरीक्षण केले व त्याबद्दल गावातील जेष्ठ नागरिकांसोबत चर्चा केली. अंदाजे ३० फुट खोल पाय-या उतरुन जिल्हाधिकारी यांनी बारव पुनर्बांधणी संदर्भाने कारवाई करण्यासाठी संबंधीत यंत्रणेना निर्देश दिले. २० वर्षांपूर्वी या बारवेतील पाणी गावकरी पिण्यासाठी वापरत असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगीतले. जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील शिव मंदिर,केशवेश्वर मंदिर ,सरस्वती मंदिर,सोमेश्वर मंदिरांना भेटी दिल्या. येरगी येथील शिलालेखाची व गावातील १८ चालुक्यकालीन काळातील अनोख्या पध्दतीने नागीरकांना पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या आडांची पाहणी केली असता, चालुक्यकालीन नागरी जलव्यवस्थापन स्थापत्यकलेचा हा एक सर्वश्रेष्ठ नमुना असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन तेथील परस बाग, हर घर नर्सरी, स्वच्छता आदींची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासोबत देगलूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम,बीडीओ शेखर देशमुख,नायब तहसीलदार मिठेवाड,सरपंच संतोष पाटील,मुख्याध्यापक परशुराम केरले व गावकरी उपस्थित होते.
येरगीचे सरपंच संतोष पाटील यांनी जिल्हाधिकारी राऊत,तहसीलदार राजाभाऊ कदम,बीडीओ शेखर देशमुख यांचा चालुक्यकालीन सरस्वती ची प्रतिमा भेट देऊन सन्मान केला .