दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनीधी- वसंत खडसे
वाशिम : जिल्ह्यात काल पार पडलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीचे रात्री उशिरापर्यंत सर्व निकाल जाहीर झाले आहेत. दोन दिवस अगोदर वाशिम बाजार समितीची निवडणूक पार पडली होती, सदर निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने १५ पैकी नऊ जागांवर विजयश्री प्राप्त करून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर मंगरूळपीर बाजार समितीमधे माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांच्या गटाने बाजी मारली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. काल पार पडलेल्या निवडणूक निकालात मालेगाव बाजार समितीमध्ये भाजप व मित्र पक्षांच्या आघाडीला जबरदस्त धक्का बसला आहे. मालेगाव बाजार समितीत १८ जागांपैकी तब्बल १७ जागांवर महाविकास आघाडीच्या ” बळीराजा ” पॅनलने एक हाती दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, भाजप व मित्रपक्षांच्या आघाडीला केवळ एका जागेवर खाते खोलून दयनीय पराभवास सामोरे जावे लागले आहे.
संपूर्ण जिल्ह्यात प्रतिष्ठेची समजल्या जाणारी रिसोड बाजार समितीच्या निवडणुकीत एरवी सहज एकछत्री वर्चस्व स्थापित करणाऱ्या गटाला यावेळेस मात्र, बहुमत सिद्ध करण्यासाठी निकराची झुंज द्यावी लागली आहे.येथे महाविकास आघाडीने अटीतटीच्या सामन्यात तब्बल आठ जागा काबीज करून प्रस्थापितांच्या एक हाती वर्चस्वाला मोठा धक्का दिला आहे. परिणामी रिसोडात सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये ना.. कुठे जल्लोष, ना.. कुठे नाराजी असे चित्र पहावयास मिळत आहे. बाजार समित्यांच्या निवडणूक निमित्ताने जिल्ह्यातील जनमताचा कौल मात्र, भाजपवर नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे.