दैनिक चालु वार्ता उपसंपादक वाशिम जिल्हा -वसंत खडसे
वाशिम : गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे विदर्भ व मराठवाड्यातील वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, अकोला, बुलढाणा आदी जिल्ह्यातील हळद व कांदा बी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून, हळद व कांदा बी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सदर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन देऊन केली आहे.
उन्हाळ्यात घेतले जाणारे हळद व कांदा बियाण्याचे पीक अत्यंत खर्चिक असून विमा संरक्षणातून वगळण्यात आलेली मसाला पिके आहेत. एकरी किमान लाख रुपयापर्यंत उत्पादन खर्च येत असला तरी, निसर्गाची योग्य साथ मिळाल्यास एकरी निव्वळ एक लाख रुपये नगद उत्पन्न देणारी ही पिके आहेत. त्यामुळे उपरोक्त जिल्ह्यात सदर पीक उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. परंतु या पिकांना दर्जेदार बनविण्यासाठी किमान एक महिना तरी कडक उन्हात वाळवत ठेवण्याची प्रक्रिया करावी लागते. परंतु त्याच मौसमात निसर्गाला आपल्या लहरीपणाची लटक आली, आणि भर उन्हाळ्याच्या दिवसात पावसाळा सदृश परिस्थिती निर्माण झाली. दररोज कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे आणि उन्हा अभावी वाळत टाकलेल्या हळदीच्या पिकाची जाग्यावरच कुजून नासाडी होत आहे. तर कांदा बियाण्याची फुलं सडून जात आहेत. परिणामी निव्वळ नफा उत्पन्न तर नाहीच, पण त्यासाठी लाखो रुपये केलेला उत्पादन खर्च वसूल होणे सुध्दा मुश्किल झालेआहे. त्यामुळे हळद व कांदा बी उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत अशा बिकट परिस्थितीत सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून, त्यांना नुकसान भरपाई म्हणून तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.