दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्ह्यात नुकताच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका पार पडल्या आहेत. मानवत वगळता पार पडलेल्या या निवडणूकीत अकरा ठिकाणी आपलीच सरसी व्हावी, यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापल्या पध्दतीने व्युहरचना करुन तसे नियोजनही केल्याचे समजते. अनेक नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पूरती पणाला लावली होती. ह्या निवडणुकीत उमेदवारांपेक्षा नेत्यांचीच सत्वपरीक्षा ठरली गेली. कॉंग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आघाडी कायम ठेवत भाजपसह अन्य सर्वच पक्षांची त्रेधा तिरपट उडवण्याचा चंग बांधला होता. नैसर्गिक आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (आमदार बाबाजानी दुर्राणी) ला मात्र सोईस्करित्या बाजूला सारत आघाडीतील मुरब्बी नेत्यांनी आपली खेळी यशस्वी ठरविली.
त्याचाच फायदा घेत जिल्ह्यात आघाडीने सर्वाधिक समित्यांवर कब्जा मिळवत जिल्ह्यात आपणच एक नंबरचे असल्याचे सिध्द केल्याची चर्चा आहे.
भाजपने मात्र यावेळी पहिल्यांदाच मोठ्या ताकदीने रणांगण गाजवण्याचे ठरवल्याचे दिसून आले. राज्य व केंद्रात सत्ता असल्याचा फायदा या निमित्ताने जेवढा घेणे शक्य होईल, तेवढा घेण्याचा चंग बांधला होता. असं असलं तरीही ‘परभणी जिल्हा, शिवसेनेचा बालेकिल्ला’ म्हणून सांगणारे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहूल पाटील यांना पूर्णपणे शह दिला. इतकेच नाही तर त्याच परभणीच्या तटबंदी किल्ल्याला छेद देत चक्क चार मावळे विजयी करुन दाखवले. कधी नव्हे ते यश खेचून आणले. प्रारंभी धाकधूक भरलेल्या भाजपने आघाडीचा तटबंदी डाव हेरला व ऐनवेळी दगा-फटका परवडणारे नाही, म्हणून एरव्ही राज्यात व देशपातळीवर विरोधाचा काहूर माजवणाऱ्या शेतकरी संघटनेला व अरविंद केजरीवालच्या आप ला प्रसंगी बाबाजानी यांच्या राष्ट्रवादीलाही पडद्याआडून बरोबर घेत मतांची जुळवणी करण्याचा घाट घातला. घातलेला तो घाट, काही अंशी का होईना परंतु पथ्यावरही पडला गेला असे म्हणायला मुळीच हरकत नसावी.
अशीच टक्कर देत भाजपने जिंतूरात चौदा जागा मिळवत पूर्ण बहुमत सामील केले आहे. तद्वतच निर्विवाद सत्ता मिळवून तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे खेचून घेतल्या आहेत. त्याशिवाय बोरी येथेही दहा जागा काबीज करून तेथेही सत्तेचा मार्ग मोकळा केला आहे. तथापि ताडकळस या ठिकाणी मात्र अटीतटीच्या व अत्यंत चुरशीच्या लढाईत भाजपला तेथे नऊ जागांच्या पुढे जाता आले नाही. त्यामुळे सत्ता संपादनासाठी तेथे भाजपाला कोणती तरी रणनीती निश्चितच खेळावी लागेल एवढे नक्की. एकूणच काय तर भाजपने या ना त्या माध्यमातून
जिल्ह्यात आपली सत्ता आणता यावी यासाठी अहोरात्र केलेली मोर्चेबांधणी बऱ्यापैकी यशस्वी ठरली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, एरव्ही सतत भाजपच्या संगतीने नव्हे भाजपाचेच खंदे समर्थक म्हणून वावरणारे रासपचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मात्र गंगाखेड विधानसभा मतदार संघात सर्वत्रच भाजपला चार हात लांब ठेवत मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला भरीव मदत केल्याचे दिसून आले. त्याचीच फलश्रुती म्हणून माजी खासदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख ॲड. सुरेश जाधव यांना पालम तालुक्यात तब्बल १४ जागांवर विजय मिळवणे शक्य झाले. सेनेला जणू हा जॅकपॉटच लागला म्हणायला हरकत नाही. असाच काहीसा जॅकपॉट सोनपेठ मतदार संघातही लागला म्हणायला हरकत नसावी. तेथेही ॲड. जाधव यांचे प्रयत्न कारणी लागले गेले. तेथेही त्यांना सहा जागांवर विजय मिळवणे शक्य झाले. त्यामुळे ॲड.जाधव यांच्या शिवसेनेला या निवडणूकीत प्रथमतःच उतरुन तब्बल २० जागांचा लागलेला तो जॅकपॉट भविष्यात सर्वच राजकीय पक्षांना धडकी भरवणारा ठरला जाऊ शकतो, असं म्हटलं तर मुळीच चुकीचं ठरणार नाही. रासपचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या मदतीने का होईना, परंतु मुख्य मंत्र्यांच्या शिवसेनेने या निमित्ताने का होईना परंतु आपली पाळेमुळे मजबूत रोखायला केलेली ही पहिलीच सुरुवात एकदम पथ्यावर पडल्याचे दिसून आले आहे.
निवडणूक, मग ती कोणतीही असो. कोणी ना कोणी आणि कोणाची तरी मदत घेतच असतो. आघाडीचे घटक पक्ष मग ती कॉंग्रेस असो वा शिवसेना, किंवा भाजपा, हे सारे पक्ष कोणी राष्ट्रीय स्तरावर तर कोणी राज्य स्तरावर कार्यरत आहेत. तरीही संस्था, मंडंळं, आघाड्या किंवा संघटनांची मदत घेणे भाग पडलेच आहे तर मग नव्याने म्हणजेच मागील दहा महिन्यांपूर्वीच अस्तित्वात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेने रासपच्या आमदारांची मदत घेतली तर कुठे बिघडले ? बदलत्या राजकीय सत्तेची समीकरणे डोळ्यासमोर ठेवून कदाचित तो निर्णय घेणे रासपला जरुरीचेही वाटले असावे ? यालाच तर सत्तेचा जुमला म्हणतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून बघितले जाणारे डॉ.रत्नाकर गुट्टे यांना कदाचित त्यांचाही सल्ला असू शकतो. केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अनेकदा काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे सर्वश्रुत आहे. किंबहुना तेच डाव देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा खेळले असावेत, अन्यथा घनिष्ठता असलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांना डावलून एवढा मोठा निर्णय डॉ. गुट्टे घेऊच शकणार नाहीत. असे कोणालाही अवगत होण्यासारखे आहे.
राज्य व देशात भाजपबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती कायम ठेवून यापुढील सर्व निवडणूका मिळून लढवायच्या आहेत. त्याचाच हा एक भाग असू शकतो. विशेष म्हणजे राज्याची राजकीय व देशाची आर्थिक राजधानी म्हणून संबोधले जाणाऱ्या मुंबईची महापालिका भाजपाला येणकेण प्रकारे जिंकायचीच आहे. त्यामुळेही शिवसेनेला दरकिनार करुन चालणारे नाही, हे स्पष्ट आहे. भाजपाने डॉ.रत्नाकर गुट्टेंच्या नथीतून का होईना, परंतु मारलेला हा तीर परभणी जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलण्यासाठी ही भविष्यात उपयोगी पडू शकतो. यांचे एकमेव कारण म्हणजे परभणी लोकसभा खासदार संजय जाधव आणि विधानसभा आमदार डॉ.राहूल पाटील हे नेते शक्तीशाली असून ते दोघेही उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खंदे पुरस्कर्ते आहेत. एक उध्दव ठाकरे यांचे तर दुसरे आदित्य ठाकरेंचे अत्यंत विश्वसनीय असल्यामुळे जराही इकडे तिकडे होणार नाही, हे गृहीत धरून कदाचित त्यांना शह देण्यासाठीच ही खेळी खेळली गेली असू शकते.
राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी हे नैसर्गिक आघाडीचे घटक पक्ष असूनही त्यांच्यात व कॉंग्रेस-शिवसेनेबरोबर असलेले सख्ख्य सर्वश्रुत आहेच. त्यांच्यातील दुहीला कारणीभूत बाबाजानी यांचा अडेल (हट्टी) स्वभावच असल्याचे बोलले जात आहे. जोपर्यंत या नेत्यांमध्ये सामंजस्य निर्माण होणार नाही, दूरगामी विचार केला जाणार नाही, तोंपर्यंत असाच यांच्यातील राजकीय ताण तणाव वाढत राहाणार आहे. त्यासाठी बाबाजानी यांना आपल्या स्वभावात बदल करावा लागणार आहे. अन्यथा भविष्यातही ही दरी अधिक वाढू शकेल, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज पडू नये. दरम्यान, या निवडणूकीत राजेश विटेकर यांनी मात्र या कथित वादापासून चार हात लांबच राहून सत्ता संपादनासाठी जे जे करणे आवश्यक आहे, ते ते आपल्या पध्दतीने केले व यशस्वीही करून दाखवले एवढे खरे.
जिंतूरच्या आमदार मेघना साकोरे/बोर्डीकर या सुध्दा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वसनीय असल्याचे बोललं जातंय. त्यांनी वडीलांच्या आमदार काळापासून आत्मसात केलेली राजकीय शिकवणूक चांगलीच पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. एकहाती सत्तेबरोबरच त्यांनी अन्य ठिकाणी सुध्दा मिळवलेला विजय परभणीच्या भावी राजकीय पथ्यावर पडला जावू शकतो, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. त्यांनी घेतलेली जिंतूर, पाथरी, गंगाखेड, ताडकळस व आदी ठिकाणची घोडदौड बरेच काही सांगून जाते आहे तर इकडे परभणीत आनंद भरोसे व लगतच्या तालुक्यांतून डॉ. गुट्टेंबरोबर शिवसेनेचे ॲड.सुरेश जाधव या जोडगोळीने मारलेली मुसंडी भाजपाला पुरक व समर्थनीय अशीच ठरु शकते. तद्वतच संपन्न कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत मिळालेले विजय आगामी राजकारणाची समीकरणे किती प्रमाणात व कशा पध्दतीने बदलायला पथ्यावर पडू शकेल, हे येणारा काळच दाखवून देईल एवढे मात्र खरे. नैसर्गिक उन्हाळा व कमालीचा उष्माघात असूनही गारपीट व सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने जसा धमाका केला किंबहुना तसाच काहीसा राजकीय धमाका अनाकालनीय निकालामुळे झाल्याचे दिसून आले. कोणाला विजयाचा विश्वास होता तर कोणाला पराजयाचा दू:श्वास. तरीही अटीतटीच्या व अत्यंत चुरशीच्या या लढाईत आघाडी व युतीने आपापल्या परीने मिळवलेले यश लक्षणीय असंच म्हणावं लागेल एवढं खरंय.
त्यांचं काय होणार ?
दरम्यान, एखाद्या चित्रपटात साईड हिरोची भूमिका निभावतात तसे या निवडणूकीत आघाडी व युतीला ज्यांनी ज्यांनी कोणी थेट तर कोणी पडद्याआडून, कोणी आशेने तर कोणी स्नेहभावाने मदत केली, त्यांचं राजकीय भवितव्य ते काय, हे सुध्दा आगामी काळात दिसून येणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना, अरविंद केजरीवाल यांचा आप, वंचित बहुजन महासंघ व अन्य जे कोणी गुप्तपणे मदतीचे औदार्य दाखवण्यात आघाडीवर होते. ज्यांनी आपले भरलेले नामनिर्देशन पत्रं मागे न घेता अखेरपर्यंत तसेच ठेवून राजकीय अस्थिरता निर्माण होईल, असे चित्र उभे केले होते. कांहींना आशा, अभिलाषा अर्थात मधाचं बोट दाखवत कथित काम साध्य करुन घेतलं गेलं, त्या सर्वांची राजकीय वर्णी कुठे कुठे व कशी लावली जाईल, हे सुध्दा लपून न राहाता लवकरच कळून आल्याशिवाय राहाणार नाही.