दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार ;- कंधार तालुक्यातील पेठवडज हे गाव जास्त लोकसंख्या असलेले एक ऐतिहासिक गाव असून संपूर्ण गावाच्या सभोवताल घाण पाण्याने वेढा दिलाआहे. येथील घाण पाण्यामुळे परिसरातील अनेक जणांना अनेक वर्षापासून हायड्रोसीयल व हत्तीपाय रोगाची मोठ्या प्रमाणात बाधा झाली आहे. गावाच्या वरील बाजूस पाझर तलाव आहे, या तलावातून पाणी नेहमी पाझरत असते. व्यवस्थितपणे पाणी जाण्यासाठी मोकळा मार्ग नाही. त्यातच गावातील घाण पाणी त्यामध्ये सोडल्यामुळे त्या घाण पाण्यामुळे बेसरम,लव्हाळी,पाणसरअशा प्रकारच्या बिनकामी अनेक वनस्पती तयार झाल्या आहेत. वनस्पती व घाण पाणी यामुळे डासांचे प्रमाण फार मोठे वाढले आहे. डासांपासून माणसांना अनेक रोगाचा प्रादुर्भाव होतो आहे. हत्तीपाय, हायड्रोशियल, डेंग्यू, चिकणगोण्या व लहान मुलांना आतड्याचे रोग होत आहेत तरी घाण पाणी जाण्यासाठी नाली बांधकाम करून देण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव जाधव, पांडुरंग कंधारे,गजानन जाधव यांनी जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना निवेदन देऊन नाली बांधकाम करून देण्याची मागणी केली आहे.