दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी -मन्मथ भुस्से
अर्धापूर/निमगाव: तालुक्यातील निमगाव येथे आदिवासी कोळी महादेव समाजाचा जिल्हास्तरीय २५ वा सामूहिक विवाह मेळावा संपन्न झाला. १५ जोडपी रविवारी विवाहबध्द झाली. या विवाह सोहळ्यात आदिवासी पारंपारिक वाद्यांच्या तालावरील नृत्याचे विशेष आकर्षण होते. विशेषता वधुवरांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली.
अदिवासी कोळी महादेव समाजाने लग्नामध्ये होणारा अनावश्यक खर्च टाळून विवाह सोहळ्यात आपल्या मुलामुलींचे लग्न लावण्याची परंपरा सुरु ठेवली आहे. विवाहासाठी शेती विकणे, कर्ज काढणे या मुळे येथील आदिवासी कोळी समाज दिवसेंदिवस कमकुवत व भूमीहीन होत चालला होता. या मेळाव्यामुळे वधु पित्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
मोठ्या प्रमाणात अदिवासी महादेव कोळी लोकसंख्या असलेल्या अर्धापूर तालुक्यातील निमगावच्या ग्रामस्थांनी कै. माधवराव मोळके, कै.चंद्रभान घोरपडे, कै.परसराम मोळके, दगडुजी जगताप, किशोर सुर्यवंशी, गंगाराम झुडपे आदींच्या संकल्पनेतून मागील पंचवीस वर्षांपासून सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा जोपासत रविवारी ७ रोजी झालेल्या सामुहिक विवाह मेळाव्यात १५ लग्न लावत उत्कृष्ट नियोजन ठेवले होते. विशेष म्हणजे एक ही सेकंद लग्न उशिरा न लागता वेळेवर लावण्यात आले.
विवाह सोहळ्यास गेल्या एका महिन्यापासून समाज बांधव व सर्वधर्मिय ग्रामस्थ भाग घेऊन मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत होते. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला आ.माधवराव जवळगावकर, मा. आ. नागेश आष्टीकर, गंगाधरराव चाभरेकर, मंगाराणी अंबुलगेकर, आनंदराव भंडारे, नागनाथ घिसेवाड, व्हॉईस मिडियाचे तालुकाध्यक्ष गोविंद टेकाळे नागोराव भांगे पाटील, रामराव भालेराव, शेख साबेर, छगनराव इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आदर्शवत विवाह सोहळा…!
सामूहिक विवाह मेळाव्यास उपस्थित राहुन शांततेत सर्व कार्यक्रम पार पाडल्या बद्दल व उपस्थित राहिल्या बद्दल आदिवासी कोळी महादेव समाज व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी सुरू केलेली परंपरा अविरतपणे पुढे नेण्यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला आहे. अत्यंत सुरेख असे नियोजन ठेवण्यात आले होते. एकाचवेळी हजारो नागरिकांची पंगत बसून जेवण दिले जाते. वाढपी काही मिनिटातच ही वाढ करतात. येथील ग्रामस्थांच्या आदर्शवत नियोजनाचे पंचक्रोशीत कौतूक होत आहे.