दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी-शहाबाज मुजावर.
महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत दि. २० मे ते ५ जून २०२३ पर्यंत ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पन्हाळा नगरपरिषदेच्याच्या वतीने रिड्यूस, रियुज आणि रिसायकल (आरआरआर-RRR) केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. शनिवारी ( दि. २० ) रोजी पन्हाळा घनकचरा व्यवस्थापन, केंद्र येथे या केंद्राचा प्रारंभ करण्यात असून, सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत हे केंद्र सुरू राहणार आहे. यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतनकुमार माळी उपस्थित होते. तसेच नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी आणि सफाई मित्र उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, चप्पले, ई-कचरा आणि इतर निरुपयोगी वस्तू नागरिकांकडून गोळा करून त्यांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. यासाठी नगरपरिषदेच्या वतीने घंटागाडीच्या आणि ई-रिक्षाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच घंटागाडी शहराच्या विविध भागांतून दररोज निरुपयोगी वस्तू गोळा करण्यासाठी फेरी मारणार आहे. उपक्रमामध्ये जमा केलेल्या वस्तूंची नोंद नोंदवहीमध्ये ठेवली जाणार आहे. गरजू नागरिकांना त्यांना आवश्यक अशा वस्तू या केंद्रातून घेता येणार आहेत. या अभियानामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेवून तसेच घरातील निरुपयोगी वस्तू ‘आरआरआर’ केंद्रामध्ये जमा करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी, चेतनकुमार माळी यांनी केले आहे. ५ जून २०२३ रोजी जागतिक पर्यावरणदिनी स्वच्छता मोहीम व स्वच्छतेची प्रतिज्ञा घेऊन या अभियानाची सांगता होणार आहे, असे प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी सांगितले.