दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजिनगर – मोहन आखाडे
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा अपघात नव्हे खून झाल्याचा संशय आहे, असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील शिरसाट यांनी केली. विशेष म्हणजे याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिघे यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करायला हवी, अशी मागणी करणार असल्याचे देखील शिरसाट म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिरसाट बोलत होते.
काय म्हणाले संजय शिरसाट?
आनंद दिघे यांचा ठाण्यातील आश्रम कोणेतरी बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याच्या बातम्या येत आहेत. खरतर आनंद दिघे हे ठाण्यातील प्रत्येक घरातील दैवत आहेत. तर प्रत्येक लोकांच्या मनात असा संशय आहे, आनंद दिघे यांच्या झालेल्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. अनेकांचे असे मत आहे की, आनंद दिघे यांचा झालेला अपघात नसून त्यांचा खून झालेला आहे. आनंद दिघे यांना दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळणार होते. पण त्या दिवशी नेमकं काय घडले, ज्यामुळे आनंद दिघे यांचा मृत्यू झाला. एकनाथ शिंदे हे त्यांचे कट्टर शिवसैनिक आहेत. तर दिघे यांची आठवण प्रत्येक ठाणेकरांच्या मनात आहे. पण दिघे यांच्या मौतीला नसलेले लोकं आज तिथे जाऊन माथे टेकत असल्याचे शिरसाट म्हणाले.
औरंगजेबावरून ठाकरे गटावर टीका…
औरंगजेबचा मुद्दा सताधारी जाणीवपूर्वक समोर आणत राज्यात हिंसाचार घडवला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असल्याचा प्रश्नाला उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, औरंगजेबचा जन्म आणि त्याला कोणी जन्माला घातले ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या कबरीला संरक्षण आम्ही नाही तुम्ही दिले आहे. मुंबई बॉम्ब ब्लास्ट आरोपीच्या कबरीची सजावट तुम्ही केली आहे. ज्याला औरंगजेबच्या कबरीवर प्रेम असेल त्यांनी ती कबर घेऊन जावी, असं शिरसाट म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर टीका
संजय राऊत आता आमचे नाव सन्मानाने घ्यायला लागले. युती बाबत आता ते बोलताय, मी साक्षीदार आहे. भाजप आम्हाला पहिले अडीच वर्ष मुख्यमंत्री पद द्यायला तयार होते. मात्र पवार साहेबांनी गुगली टाकली, आणि याना पाच वर्ष मुख्यमंत्री पदाची स्वप्न दिसली. तर संजय राऊत आता म्हणतात ईडीच्या भीतीने लोक गेले आहेत. आतापर्यंत आम्हाला गद्दार म्हणत होते, खोके वाले म्हटले आणि आता भूमिका का बदलली आहे. आज ही आमचे त्यांना आवाहन आहे की, काँग्रेस-राष्ट्रवादीची सोडावी. तसेच राऊत यांना आमच्याबद्दल कळवळा आलेला आहे चांगला आहे, असेही शिरसाट म्हणाले.