दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहराच्या मध्यवस्ती भागात असलेली प्रशासकीय इमारत अत्यंत खिळखिळी झाली असून कोणत्याही क्षणी मोठा धोका उद्भवला जाईल, याची शक्यता स्पष्ट झाल्याने सदर इमारतीमधील सर्व सरकारी कार्यालयांनी अन्यत्र स्थलांतरीत व्हावे, या संबंधीच्या सूचना आज जिल्हा प्रशासनाने नोटीसांद्वारे दिल्या आहेत.
प्रशासकीय इमारतीमधील भूमिअभिलेख कार्यालयात स्लॅबचा मोठा हिस्सा काही महिन्यांपूर्वी कार्यालयीन कामकाज वेळेदरम्यान कोसळला होता. त्यामुळे या इमारतीच्या अवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली गेली होती. इमारत धोकादायक झाली असून प्रशासनाच्या दूर्लक्षितपणामुळेच कोणत्याही क्षणी मानवीय हानीची शक्यता नाकारता येणार नाही, असे सणसनीखेज वृत्त चालु वार्ता या मराठी दैनिकाने ठळकरित्या प्रसिद्ध केले होते. सदर वृत्ताची दखल घेऊन नागरिकांनी सुध्दा हा विषय लावून धरला होता. त्याचाच परिपाक म्हणून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी तत्परतेने या इमारतीची पहाणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गोयल यांनी वरील प्रमाणे निर्णय घेऊन भविष्यात होणारा धोका टाळण्यासाठीच हे मानवीय पाऊल उचलल्याचे दिसून आले. याच अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी या इमारतीची मध्यंतरी पडताळणीही केली होती परंतु, अभियंत्यांनी नेमका कोणता अभिप्राय दिला हे कळलेच नव्हते. त्यामुळे अनेक शंका-कुशंकांना वाव असल्याचे दिसून आले. मात्र, जिल्हाधिकारी सौ.गोयल यांनी आज गुरुवार, दि.१५ जून रोजी भूमिअभिलेख कार्यालयासह अन्य कार्यालयांनी तातडीने तेथून स्थलांतर करावे, असा मौलिक सल्ला दिला. किंबहुना त्याच सल्ल्याच्या अनुषंगाने भूमिअभिलेख कार्यालयाने गुरुवारी सायंकाळपासूनच या प्रशासकीय इमारतीमधून गाशा गुंडळण्यास सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयीन इमारतीच्या तळमजल्यावर स्थलांतर होण्याची त्यांना सौ.गोयल यांनी परवानगी दिली. परंतु, या इमारतीमधील जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, पशू संवर्धन कार्यालय व अन्य शासकीय कार्यालयांनी तेथून अन्यत्र स्थलांतरासंदर्भात कोणत्याही हालचाली सुरु केल्या नसल्या तरी त्यांना तसे करुन चालणारे नाही. दरम्यान, या इमारतीमधील सर्वच कार्यालयांना तेथून अन्यत्र स्थलांतरीत व्हावेच लागेल, ही इमारत धोकादायक स्थितीत आली आहे, अशी माहितीही जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे.
एकूणच काय तर, चालु वार्ता या मराठी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दत्तात्रय कराळे यांनी सुमारे २७ वर्षांपूर्वी बांधलेल्या या प्रशासकीय इमारतीचा संभाव्य धोका ओळखून सणसनीखेज वृत्त छापून प्रामुख्याने जिल्हा प्रशासनाचे लक्ष्य वेधले होते. तद्वतच याच वृत्ताची दखल घेत प्रशासनाप्रति जनतेनेही कमालीचा संताप व्यक्त केला होता. अन्यथा ‘सरकारी काम आणि सहा वर्षे थांब’ ही बिरुदावली सर्वश्रुत अशीच आहे. असे जर झाले नसते तर किती जणांना आपले प्राण गमवावे लागले असते, हे वेगळे सांगायला नको. जिल्हा प्रशासनाच्या या गतिमान निर्णयामुळे अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून जिल्हा प्रशासनाची ही गतिमान कृती आणि दै.चालु वार्ताची मानवीय नीती याबद्दल जनतेतून आनंद व्यक्त केला जात आहे एवढे नक्की.