दैनिक चालु वार्ताउपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“परभणी : आषाढी एकादशीनिमित्त औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर), अकोला आणि आदिलाबाद येथून पंढरपूर साठी २५ जून ते ५ जुलै दरम्यान प्रतिदिन तीन विशेष रेल्वे चालवण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. यासंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय प्रबंधक श्रीमती नीती सरकार यांना एक निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त मराठवाड्यातून लाखो भाविक-भक्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी जात असतात. दिनांक २५ जून ते ५ जुलै दरम्यान ही यात्रा सुरु असते. या कालावधीत औरंगाबाद- पंढरपूर, अकोला-पंढरपूर आणि आदिलाबाद-पंढरपूर अशा तीन विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात याव्यात त्याशिवाय नियमित चालू असलेल्या निजामबाद-पंढरपूर गाडीला पाच अतिरिक्त डबे या काळात जोडण्यात यावेत, जेणेकरून यात्रा दरम्यानच्या कालावधीत अधिकच्या संख्येतील प्रवाशांना प्रवास करणे सुखकर होऊ शकेल. अशा प्रकारच्या विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या असून द.म.रे.नांदेड विभागीय नियंत्रक नीती सरकार यांनी भाविक-भक्तांना कोणताही त्रास न होता त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मानवीय दृष्टीकोनातून सहानुभूतीने विचार केला जावा, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदनावर मराठवाड्यातील प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंडे, रितेश जैन, डॉ. राजगोपाल कलानी, बाळासाहेब देशमुख, शिवलिंग बोधने, माणिक शिंदे , कदिरलाला हाशमी, दत्तात्रय कराळे, विठ्ठल काळे, रुस्तुम कदम, प्रकाश लाखरा, दयानंद दीक्षित, श्रीकांत गडापा आदींनी विनंती केली आहे