दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्ह्यातील कांही भागातील रेल्वे लाईन विकसित करण्यात येत आहे. त्या निमित्ताने शनिवार, दि.१७ जून २०२३ रोजी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्याचाच परिपाक म्हणून कांही प्रवासी रेल्वे उशीरा धावल्या जाणार आहेत, अशी माहिती द.म.रे.नांदेड विभागीय जनसंपर्क विभागातर्फे देण्यात आली आहे.
शनिवार, दि.१७ जून रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सोडल्या जाणाऱ्या मुंबई-हजूर साहिब नांदेड गाडी क्र.१७६१७ तपोवन एक्स्प्रेस जालना ते सेलू दरम्यान तब्बल १३५ मिनिटे उशीराने धावली जाईल. गाडी क्र.१७६३० नांदेड ते पुणे एक्स्प्रेस परभणी-मानवत रोड दरम्यान ५० मिनिटे उशीराने धावली जाईल. गाडी क्र.१७६६१ काचिगुडा-नगरसोल एक्स्प्रेस परभणी-मानवत रोड दरम्यान तब्बल १९० मिनिटे उशीराने धावली जाईल. गाडी क्र.१२७८८ नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस दि.१३ जून रोजी जालना ते सेलू दरम्यान ९० मिनिटे उशीराने धावणार आहे. गाडी क्र.१७२३२ नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस दि.१७ जून रोजी जालना ते सेलू दरम्यान ९० मिनिटे उशीराने धावणार आहे तर गाडी क्र.१७६८८ धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस दि.१४ आणि १८ जून रोजी धर्माबाद येथून ६० मिनिटे उशीराने म्हणजेच सकाळी ५ वाजता सुटली जाणार आहे.
*दोन गाड्या अंशतः रद्द*
“””””””””””””””””””””””””””””””
हाती घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे दोन गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये गाडी क्र.११४०९ दौंड-निजामाबाद एक्सप्रेस दि.१४ ते १७ जून दरम्यान मुदखेड ते निझामाबादमध्ये अंशतः रद्द करण्यात आली आहे. गाडी क्र. ०१४१३ निझामाबाद-पंढरपूर एक्स्प्रेस दि.१५ ते १८ जून दरम्यान निझामाबाद ते मुदखेड मध्ये अंशतः रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती द.म.रे.ने कळविली आहे.
विद्यमान कालावधीत आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरची यात्रा असल्यामुळे द.म.रे.कडून प्रवासी भक्तांना सहकार्य करणे अपेक्षित होते. तथापि हाती घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे प्रवासी भक्तांना विलंब किंवा त्रास होणे या सारख्या समस्या उद्भवल्या जाणार आहेत. ज्यामुळे भक्त ठराविक मुदतीत पंढरपूरला पोहोचण्यास अडथळा निर्माण होऊ शकेल, हे रेल्वे प्रशासनाने ध्यानात घेणे गरजेचे होते. हाच मेगा ब्लॉक यापूर्वी सुध्दा घेता आला असता परंतु तसे न करता प्रशासनाने भक्तांसाठी हा एकप्रकारे खोळंबाच निर्माण केला आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही,असा घणाघाती आरोप मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे सदस्य दत्तात्रय कराळे यांनी केला आहे.
दरम्यान, आगामी २५ जून ते ५ जुलै या कालावधीत प्रवासी महासंघातर्फे सूचित केल्याप्रमाणे प्रतिदिन तीन नव्या रेल्वे गाड्या सुरु करुन समस्त भाविक भक्तांना रेल प्रशासनाने दिलासा द्यावा, प्रशासनाला अशी विनंती असल्याचेही दत्तात्रय कराळे म्हणाले.