दैनिक चालुवार्ता :उपसंपादक अमरावती-श्रीकांत नाथे
अमरावती :मिशन मेळघाट’मध्ये चिखलदरा व धारणी या दोन तालुक्यांसाठी गाव व पाडे हे एकक मानून समग्र विकास आराखडा आकारास येत असून,दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत,असे प्र.जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी सांगितले.
“मिशन मेळघाट”गाभा समितीची बैठक व गावोगाव विविध अधिकाऱ्यांच्या भेटी असा कार्यक्रम नुकताच झाला.त्यातील निर्णयानुसार मेळघाटाची विशिष्ट भौगोलिक संरचना लक्षात घेऊन सामाजिक,आर्थिक बाबींच्या अनुषंगाने आताच्या व भविष्यातील आवश्यक सुविधांसाठी २०४७ पर्यंतचे नियोजन करण्यात येत आहे.
मेळघाटातील कुपोषण,आरोग्य,रोजगार,शिक्षण,पाणीपूरवठा,वन हक्क कायदा व पेसा कायदा यानुसार हा आराखडा तयार होणार असून,जिल्हा नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे.तालुकास्तरीय नोडल अधिकारी दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार व गटविकास अधिकारी असतील,अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
“मिशन मेळघाट” बाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून मेळघाटात उपलब्ध सुविधांची माहिती संकलित करणे,अल्पकालीन उपाययोजनांत सन २०२७ व २०३७ पर्यंतचे व दीर्घकालीन उपाययोजनेत सन २०४७ पर्यंतचे नियोजन करण्यात येईल.नोडल अधिकाऱ्यांवर सर्व यंत्रणांचा समन्वय व साप्ताहिक आढाव्याची जबाबदारी असेल.आराखडयास गावस्तरावर प्रसिध्दी देऊन स्थानिकांचे अभिप्राय व सूचना घेण्यात येतील व त्यानंतर विकास आराखडा अंतिम होईल.क्षेत्रातील तज्ज्ञ संस्था, व्यक्तींचेही सहकार्य घेतले जाईल.
धारणी व चिखलदरा येथे जिल्हा प्रशासनाकडून दर १५ दिवसांनी सर्व यंत्रणांची आढावा सभा घेण्यात येईल.नोडल अधिकाऱ्यांनी धारणी येथील प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत आवश्यक संसाधनांची उपलब्धता करून घ्यावी,असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.