दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच….वारी हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते. ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटर पायी चालत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम्य सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. त्या वारी मध्ये माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय सोपान काका व मुक्ताई बरोबर चालण्याची सर्वांचीच इच्छा पूर्ण होते का ? तर अजिबात नाही; त्यासाठी ही काहीतरी पुण्य – भाग्य असावा लागत. पण मला सांगायला आनंद वाटतो की अशा थोड्याच भाग्यवान पैकी मी एक आहे. प्रस्थान सोहळे पार पाडत ‘ज्ञानोबा तुकाराम’ गजर करत श्रीक्षेत्र आळंदी , देहू,पैठण,नारायणगड, भगवानगड गहिनाथगड ,मच्छिंद्रगड ,आदी. करून दिंड्या आता पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. ही पंढरीची वारी म्हणजे काय ? तर अत्यंत दुःख निवृत्ति आणि परम आनंदाची प्राप्ती म्हणजेच पंढरीची वारी .भक्तीतत्वाचा अविष्कार म्हणजेच पंढरीची वारी, प्रेमसुखाचा अनुभव घेण्याची सहज स्थिती म्हणजेच पंढरीची वारी . हजारो वर्ष अविरत सुरू आहे हाच एक हरिमय इतिहास आहे.वारीची दिव्य परांपरा आपण अगदी सोप्या आणि साध्या शब्दात पाहणार आहोत. ‘महाराष्ट्रात असंख्य प्रथा आहेत पण ही ‘पंढरीची वारी’ म्हणजे प्रथा नाही तर आपल्या विठ्ठलाप्रती मनोभावे केलेली उपासना आहे. जी अखंड आणि अभंग सुरू आहे. माझ्या परम भाग्याने आळंदी ते पंढरपूर गेली ४ वर्ष या भक्ती रंगांमध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या नाम घोषामध्ये अखंड वारी करण्याच भाग्य मला लाभलं. परंतु २०२२ मध्ये मेडिकल क्षेत्रा मध्ये फार्मसी. या डिग्री साठी प्रवेश असल्या कारणास्तव वारी होईल की नाही याची शाश्वती नव्हती. परंतु आयुष्यामध्ये काही काही वेळ काळ एवढं दुःखाचं आणि संकटाचं थैमान घालून बसतो की, आपण अखंड भगवंताला आठवतो , प्रार्थना करतो आणि दोष देण्याच्या धुंदी मध्ये असतो. कारण भगवंताचे स्मरण हे दुःखामध्येच होते. अगदी ज्ञानोबारायांचं प्रस्थान दोन दिवसा वरती आलो होत. आणि फार्मसी ची शेवटची परीक्षा ही तेव्हाच चालु होती.समोर एकच प्रश्न होता ? वारी की परीक्षा ?
पण कुठलाही विचार न करता माझ्या ज्ञानोबारायांना एकच प्रार्थना केलीकी,
गोमटे ते करा माझे | भार ओझे तुम्हासी || आणि त्याचं रात्री कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला. सर्व वह्या- पुस्तके व कॉलेज ड्रेस सगळं सोडुन अगदी २ नेहरूशर्ट २ धोतर बॅगमध्ये घेऊन आळंदी जवळ केली. ज्ञानोबारायांचे प्रस्थान झाले. वर पंढरीच्या दिशेने दिंड्या निघाल्या आणि अगदी मनाला समाधान वाटू लागलं. वारी म्हणजे एक आनंद.आनंदाचे डोही आनंद तरंग / त्या आनंद डोहामध्ये अगदी ….गाय नाचे उडे आपुलिया छंदे |मनाचे आनंदे आवडीने / किंवा नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळीया सुख देईल विसावा / या वृत्ती प्रमाणे अगदी आनंदामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये , कितीतरी ऊन, वारा, पाऊस, थंडी , या सगळ्या अडचणींवर मात करत पंढरपूर मध्ये पोहोचलो आणि जेव्हां भगवान पांडुरंग परमात्म्याचे दर्शन झालं तेव्हा,
आतां कोठें धांवे मन । तुमचे चरण देखिलिया ॥ भाग गेला सीण गेला । अवघा झाला आनंद॥ ही प्रचिती आली. अंत:करणामध्ये प्रसन्नता प्राप्त झाली.कारण पावलो पंढरी पार नाही सुखा | भेटला सखा पांडुरंग || दुःख निवृत्तीचे आणि परम सुखाचे ठिकाण म्हणजेच माझा भगवान पांडुरंग आणि त्याची वारी होय. ज्ञानोबारायांनी सांगितले आहे की, सर्व सुखाचे आगर | बाप रखुमादेवीवर || किंवा तुकोबाराय म्हणतात सुख रूप ऐसा दुजा कोण सांगा | माझ्या पांडुरंगा सारीखा तो/ पंढरपूर मध्ये आल्यानंतर एक अविस्मरणीय क्षण म्हणजेच २४ जुलै २०२२ या दिवशी माझ्या माय-बाप विठ्ठलाने साक्षात त्याच्या समोर बसून गायन सेवा करण्याची संधी मला दिली व दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या भगवान पांडुरंगाच्या कृपेनं मला सद्गुरु म्हणुन परमपूज्य विद्यावाचस्पती डॉ. जयवंत महाराज बोधले (बप्पा) यांच्या सारखे सद्गुरु भेटलेआणि अज्ञानाच्या निवृत्तीचा आणि ज्ञानाच्या प्राप्तीचा प्रवास चालू झाला. हेच माझ्या दृष्टीने वारी आणि पांडुरंगाचे महात्म्य आहे. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जीवनात एकदा तरी ही भूवैकुंठ पंढरी आपल्या डोळ्यांनी पहावी आणि आपल्या अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि आपल्या जीवनाची कृतकृत्यता करून घ्यावी असे ते मानवी जीवास सांगतात.
सद्गुरुकृपांकित
श्री.ह.भ.प-अक्षय महाराज तळेकर- पाटील
मो.७८७५३८९०५२