दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी.
नांदेड (देगलूर): नोकरी करत असताना विविध सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना विश्वकर्मा आदर्श कामगार पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार २०२२-२३ करिता अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे करण्यात आले आहे. मंडळाच्या www.public mlwb.in या संकेतस्थळावर तसेच मंडळाच्या राज्यातील सर्व कामगार कल्याण केंद्रांमध्ये या पुरस्काराचे अर्ज उपलब्ध आहेत.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १८ ऑक्टोबर २०२३ आहे. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन कामगार मंत्री मा. ना. डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडेआणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी केले आहे, अशी माहिती मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराचे नाव आता विश्वकर्मा आदर्श कामगार पुरस्कार करण्यात आले आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत कामगार कल्याण निधी भरणाऱ्या दुकाने, कंपन्या, कारखाने, वर्कशॉप्स, हॉटेल्स, उपहारगृहे, बँका आदींमध्ये कार्यरत कामगार व कर्मचारी यांना या पुरस्कारांसाठी अर्ज करता येणार आहे. कामगाराची विविध आस्थापनांमध्ये मिळून एकूण सेवाकिमान ५ वर्षे झालेली असावी, तसेच सेवेत असताना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या ५१ कामगारांना सदर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
रुपये २५ हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, तसेच मंडळाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त होऊन किमान १० वर्षे सेवा झाली असेल, अशा कामगारांकडून कामगार भूषण पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. राज्यभरातून एका कामगाराची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असून, रुपये ५० हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.