दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना खेळला गेला. ऍडलेडच्या ओव्हलवर झालाेल्या या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताच्या खेळाडूने इतिहास रचला आहे. जेव्हा-जेव्हा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली धावा करतो तेव्हा-तेव्हा तो नवनवे विक्रम आपल्या नावावर करतो. असाच काहीसा पराक्रम त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केला.
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेटविश्वातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत 115 सामने खेळताना 4008* धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. त्याने आतापर्यंत 148 सामने खेळताना 3853 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा मार्टीन गप्टिल आहे. त्याने 122 सामन्यात 3531 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे विराटने अधिकवेळा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना ही कामगिरी केली. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये केवळ 9 वेळा सलामीला फलंदाजी केली आहे. रोहितने 113 सामने तर गप्टिलने 102 सामने सलामीला येताना खेळले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक अर्धशतके करण्याचा विक्रम विराटच्याच नावावर आहे. त्याने 37 अर्धशतके केली असून रोहितने 29 अर्धशतके केली आहेत. तसेच विराटने एक, रोहितने 4 आणि गप्टिलने 2 शतके केली आहेत.
विराटने टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा (1141) करण्याचा विक्रम आधीच आपल्या नावावर केला आहे. तसेच तो स्पर्धेत एक हजार धावांचा टप्पा गाठणारा पहिलाच भारतीय आणि श्रीलंकेच्या माहेला जयवर्धने (1016) याच्यानंतर दुसरा खेळाडू ठरला.