दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : बिहारच्या राजकारणात सुरू झालेल्या गदारोळाची तार महाराष्ट्राशी जुळू लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे घडले त्यामुळे नितीश कुमार अस्वस्थ झाले आहे.
दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ‘प्रादेशिक पक्ष टिकणार नाहीत’ या वक्तव्याने जेडीयू अधिक सावध झाली आहे. त्यांनी हे वक्तव्य नुकतेच बिहारमध्ये केले होते. त्यामुळेच जेडीयूने आपले अस्तित्व वाचवण्यासाठी भाजपपासून दुरावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
प्रादेशिक पक्ष टिकणार नाहीत, असे जे. पी. नड्डा म्हणाले होते. परंतु, आमच्यासारखे प्रादेशिक पक्ष मित्रपक्षाच्या भूमिकेत आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे होते, असे जेडीयूचे ज्येष्ठ नेते उमेश कुशवाह म्हणाले. बिहारची अवस्था महाराष्ट्रासारखी होईल या भीतीने नितीश कुमार खूप घाबरल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
उद्धव ठाकरेंप्रमाणे नितीश कुमार (Nitish Kumar) यांचाही प्रादेशिक पक्ष आहे. ते आपले अस्तित्व आणि सत्ता वाचवण्याच्या मोहिमेत गुंतले आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार पाडण्यात त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा मोठा वाटा आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपशी जवळीक साधून असा खेळ रचला की, आज मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात पक्ष वाचवण्यासाठी लढा देत आहे.
उद्धव ठाकरेंप्रमाणेच नितीश कुमार यांचेही भाजपशी दीर्घ आणि सखोल नाते आहे. फरक एवढाच आहे की, नितीश यांनी २०१७ मध्ये भाजपसोबत युती करण्यासाठी मित्रपक्ष सोडले होते. तर उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत सरकार स्थापन केले होते. बिहारमध्ये सुरू असलेल्या या खेळामागे अमित शाहांचा हात असल्याची भीती नितीशकुमार यांना वाटत आहे.