दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : १ लाख ५४ हजार कोटींचा सेमी कंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. परंतु तो अचानक गुजरातला गेला. याचे उत्तर “खऱ्या मुख्यमंत्री” (देवेंद्र फडणवीस) यांनी द्यावे, असे शरसंधान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी साधले आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात असा वाद यानिमित्ताने पुढे येऊ पाहतो आहे. परंतु ज्या वेदांत कंपनीचा हा प्रकल्प आहे, त्याचे सीईओ आणि सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून नेमके काय म्हटले आहे?, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
अनिल अग्रवाल यांची ट्विट्स
देशाच्या उद्योग क्षेत्रात आज इतिहास घडला आहे. वेदांत आणि फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरात मध्ये होणार आहे. त्यासाठी 1 लाख 54 हजार कोटींची महत्त्वपूर्ण गुंतवणूक करणार आहोत.
भारताला उद्योग क्षेत्राबरोबरच अनेक क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला आम्ही हा कृतिशील पाठिंबा देत आहोत. भारतातली ही आत्मनिर्भर सिलिकॉन व्हॅली लवकरच अस्तित्वात येईल.
भारताला आत्मनिर्भरतेची दूरदृष्टी दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही आभार मानतो. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे आता भारत सेमीकंडक्टर उत्पादनातला हब बनणार आहे.
इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचे पुढचे दमदार पाऊल टाकण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
गुजरात सरकार बरोबर याबाबतचा एमओयु झाला आहे. 1 लाख 54 हजार कोटींची गुंतवणूकही निश्चित झाली आहे. यामुळे देशात नवे रोजगार तयार होतील आणि भारतीय
अर्थव्यवस्थेला तसेच एमएसएमइ सेक्टरला मोठी उभारी मिळेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.
भारताची स्वतःची सिलिकॉन व्हॅली बनविण्याचे स्वप्न लवकरच साकार होईल आणि भारतीयांच्या डिजिटल गरजा लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील. भारताचा हा प्रवास अधिकृतरित्या सुरू झाला आहे, तो लवकरच पूर्ण होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो. गुजरात सरकार आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांचे देखील आम्ही आभारी आहोत.
भारत इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनताना देशातल्या प्रत्येक राज्याला त्याचा लाभ मिळेल याची आम्ही ग्वाही देतो. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील आयात कमी करून प्रत्यक्ष उत्पादन भारतात वाढवून निर्यातक्षम उत्पादन तयार करण्यात भारतातील कौशल्य आणि निर्मिती क्षमता वापरण्याचाही आम्हाला विश्वास वाटतो. यातून विशेष कौशल्याचे 1 लाख रोजगार निर्माण होतील. केवळ नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे नवे उद्योजक तयार होतील याची आम्हाला खात्री आहे.
अनिल अग्रवाल यांनी केलेली ही ट्विट कोणत्याही प्रांतीय आणि राजकीय वादाच्या पलिकडची आणि आत्मनिर्भर भारताची दमदार वाटचाल कशी सुरू आहे, हे स्पष्टपणे नमूद करणारी आहेत.