दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मुंबई – भारतातील किरकोळ आणि घाऊक किमतीवरील वाढलेली महागाई आता पूर्णपणे नियंत्रणात येत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील महागाई वेगाने कमी होत असल्यामुळे अमेरिकेत आक्रमक व्याजदर वाढ थांबण्याची शक्यता आहे.
या दोन्ही कारणामुळे भारतीय शेअर बाजारात कालपासून आशावादी वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी बुधवारी बरीच खरेदी होऊन शेअर बाजाराचे निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी वाढले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 144 अंकांनी वाढून 62, 677 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 52 अंकांनी वाढून 18,660 अंकावर बंद झाला. टेक महिंद्रा, टाटा स्टील, एनटीपीसी, इंडसइंड बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पावर ग्रीड, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, लार्सन अँड ट्युब्रो या कंपन्यांनी आजच्या तेजीचे नेतृत्व केले. तर नेस्ले, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बॅंक, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
जिआजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, अमेरिकेतील महागाई कमी होऊन 7.1 टक्के झाली आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व व्याजदरात 0.75 टक्क्याऐवजी 0.50% ची वाढ करण्याची शक्यता आहे. भारतातील महागाई कमी झाली आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअरची खरेदी वाढली आहे.
भारताप्रमाणेच दक्षिण कोरिया, जपान, चीन, हॉंगकॉंग येथील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. अमेरिकेचे निर्देशांक काल वाढले होते. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात कमी अधिक प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. मात्र भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक अगोदरच उच्च पातळीवर असल्यामुळे ही खरेदी मंद राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेच्या शक्य सकारात्मक पतधोरणामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी 619 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याची आकडेवारी समोर आली आहे.