दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : उद्योगपती अदानी आणि अंबानी यांनी देशातील बड्या राजकीय नेत्यांना, प्रसारमाध्यमांना विकत घेतले. पण, ते माझ्या भावाला विकत घेऊ शकले नाहीत आणि कधी विकत घेऊ शकणारही नाहीत, असे म्हणत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी त्यांचे बंधू आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
राहुल यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने उत्तरप्रदेशात प्रवेश केला. त्यावेळी कॉंग्रेसच्या उत्तरप्रदेश प्रभारी असणाऱ्या प्रियंका यांनी त्या राज्याच्या सीमेवर यात्रेचे स्वागत केले. त्यानंतर केलेल्या भाषणात प्रियंका यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. ऐन हिवाळ्यात राहुल यांनी यात्रेच्या माध्यमातून लांब पल्ल्याचा पायी प्रवास केला. ते पदयात्रेत प्रामुख्याने टी-शर्ट परिधान करूनच सहभागी झाले.
त्याचा संदर्भ देऊन प्रियंका म्हणाल्या, हिवाळ्यातही राहुल यांना कशी काय थंडी वाजत नाही असा प्रश्न लोक विचारतात. ते सत्याचे कवच घालून फिरत असल्याने तसे शक्य होत आहे. मला माझ्या भावाचा अभिमान वाटतो. राहुल यांची प्रतिमा खराब करण्यासाठी सरकारने हजारों कोटी रूपये खर्च केले. दबाव टाकण्यासाठी केंद्रीय यंत्रणा तैनात करण्यात आल्या. पण, राहुल सत्याच्या मार्गावरून ढळले नाहीत आणि बिल्कूल घाबरले नाहीत. कारण ते योद्धे आहेत, असेही प्रियंका यांनी म्हटले.