दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र तमाम बहुजनांना देऊन खऱ्या अर्थाने शेकडो वर्षांपासून गुलामीत खीतपत पडलेल्या बहुजनांचा उद्धार करणारे बहुजनांचे उद्धारक उपेक्षितांचे उद्धारक महामानव जागतिक कीर्तीचे महापंडित जगातील सर्वात मोठी लिखित स्वरूपाची राज्यघटना या देशाला बहाल करण्यामध्ये प्रचंड मोठे योगदान देणारे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 ला मध्य प्रदेशात महू या ठिकाणी पिता रामजी व माता भिमाबाई यांच्या पोटी झाला.
अखिल जगाच्या आणि विश्वात्मक मानवतेच्या कल्याणकारी इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने ज्यांचं नाव लिहिलं जावं ज्यांची महानता लिहिली जावी असं सबंध भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचं नाव म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे गौरवाने आणि अभिमानाने आपण घेतलं पाहिजे. त्यांच्या जयंती निमित्ताने या ज्ञानाच्या महासागराच्या अथांग कार्याचा घेतलेला हा अल्पसा परिचय.
आपल्या असामान्य आलौकिक आणि आदरणीय गुणांमुळे आणि कर्तृत्वामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातल्या कुठल्याही आणि कोणत्याही सुज्ञ आणि जिज्ञासू व्यक्तिच्या चिंतनाचा मननाचा, आदराचा ,आनंदाचा आणि लेखनाचा विषय बनलेले आहेत.
एक महत्त्वकांक्षी लक्षवेधी, जिद्दी, निश्चयी, धोरणी, धाडसी ,कष्टाळू, अभ्यासू ,विचारी, स्वाभिमानी, कार्य कुशल, कर्तव्यदक्ष , अत्युच्च पदव्यांचा एकनिष्ठ साधक, बहुज्ञानी जनहितासाठी ज्ञानाचा सदुपयोगकर्ता, लोकहितदक्ष महानायक, जागरूक जनतेचा जननेता, सत्याग्रही झुंजार, आंदोलकारी न्यायाचा कडवा रक्षक, अन्यायाचा निर्भय शत्रू, मानवतेचा मित्र, दृष्टा समाज सुधारक, दलितांचा भाग्यविधाता, स्त्रियांचा कैवारी, शोषितांचा कुशल संघटक, क्रांतीप्रिय भविष्यदृष्टा, विघातक रूढींचा विधायक विद्धवंसक,अन्यायकारी परंपराविरुद्ध धैर्यान लढणारा अजिंक्य योद्धा, धुरंदर राजकारणी, स्वातंत्र्यसह समता व बंधुत्व या मूल्यांचा प्रबळ समर्थक, स्वतंत्र भारताच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करीत भारताचा सर्वांगीण विकास साधू शकेल अशा राज्यघटनेचा श्रेष्ठ शिल्पकार ,भारत राष्ट्र सर्वदृष्टीने समर्थ होण्यासाठी संसदीय लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता,जाणीवपूर्वक राष्ट्रहित जोपासणारा जागृत देशभक्त विचारवंत संसदपटू, वादविवाद निपुण, प्रभावी वक्ता, विविध ग्रंथांचा नित्यवाचक व संग्रहक, थोर ग्रंथ लेखक श्रेष्ठ मार्गदर्शक कर्म प्रेमक जगन्मान्य विद्वान, आपल्या वडिलांचा अत्यंत आदर करणारा विनम्र पुत्र, आपल्या पत्नीवर नेतांत प्रेम करणारा कर्तव्ये तत्पर पती, उच्च शिक्षण घेताना ज्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले त्यांच्याविषयी कर्तज्ञता बाळगणारा कृतज्ञनिषनाथ ,विधीज्ञ शिक्षण संस्थेचा दूरदृष्टी संस्थापक, धर्मप्रिय सदाचरणी स्पष्ट वक्ता, समाजाभिमुख पत्रकार ,आणि बहुभाषा भाषाप्रेमी, अशा बहविध, गुणरुपी, अलंकारानी विभूषित होऊन डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर उर्फ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असामान्य अलौकिक लोकोत्तर तेजस्वी आणि वंदनीय महामानव होऊन राहिलेले आहेत.
बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने या देशाचे नेमके वास्तव समजून घेतले होते कोणत्याही प्रश्नांच्या मुळापर्यंत जाऊन त्याचे चिंतन करणे म्हणजे खऱ्या अर्थाने तत्त्वज्ञान होय,सामान्य माणूस जेव्हा प्रगती करण्यासाठी पुढे सरसावतो तेव्हा या देशातील शोषक शक्ती त्याच्यासमोर गतिरोधकासारखी उभे राहतात. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या नितीमूल्यांवर आधारलेली समता निर्माण करण्याचे माझे तत्त्वज्ञान आहे. जोपर्यंत कोणत्याही समाजात मूल्यांतर होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने क्रांती होणार नाही. हे बाबासाहेबांना ठाऊक होते घरामध्ये कोणत्याही प्रकारचा सांस्कृतिक शैक्षणिक वारसा नसताना बाबासाहेबांनी ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने हिमालयाची उंची गाठली होती, कोलंबिया विद्यापीठात जगातील शंभर गुणवंत विद्यार्थ्यांची यादी आहे ज्यामध्ये बाबासाहेबांचे नाव हे प्रथम क्रमांकावर आहे हे तुम्हा आम्हा सर्व भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.
बाबासाहेबांना अगदी बालपणापासूनच वाचनाची प्रचंड मोठी आवड होती खऱ्या अर्थाने ज्ञानाचे ते उपासक होते. त्यामुळे पुस्तकांवर त्यांची नितांत आणि आढळ निष्ठा होती. केवळ ग्रंथासाठी राजगृह नावाचा बंगला बांधणारा या देशातील एकमेव राजकीय नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या राजगृह या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये आजही जवळजवळ 35 हजार पुस्तकांचा संग्रह आपल्याला पाहायला मिळतो. एवढे मोठे वैयक्तिक ग्रंथालय जोपासणारा एक महान पुस्तक प्रेमी या देशात निर्माण झाला हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे शिक्षण हे सामाजिक क्रांतीचे शस्त्र बनविण्याचे विचार बाबासाहेबांच्या शिक्षण विषयक विचारातून दिसून येतात. या देशातील पारंपारिक शिक्षण व्यवस्था ही सदोष आहे ज्ञानबंदी आणि शिक्षण बंदी मंदिर, मशीद ,चर्च यांच्यापेक्षाही जास्त पावित्र्य हे खऱ्या अर्थाने शिक्षणाचे आहे . शिक्षणामुळे माणसाचे मन सुसंस्कृत करता येते. या देशातील शिकलेल्या माणसांमध्ये हिम्मत ज्ञान संयम स्वावलंबीत्व स्वाभिमानीवृत्ती या सर्व गुणांचा संचार होऊ शकतो. माझ्या देशात सात कोटी दलित बांधव हे निद्रिस्त आहेत ज्यांना जागे करण्यासाठी मी इथे 24 तास जागतो आहे . इंग्लंडमध्ये बॅरिस्टरची पदवी घेताना शेजारी बसलेल्या एका भारतीयाला दिलेले उत्तर. या देशातील विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वावर व कर्तव्यावर या देशाचे भवितव्य अवलंबून आहे. तुमच्या बौद्धिक शक्तीचे संवर्धन करा हा संदेश बाबासाहेबांनी नेहमीच विद्यार्थ्यांना दिलेला आहे. विद्यार्थ्यांनो विवेकी शक्तीची ज्योत तुमच्या मनामध्ये प्रज्वलित करा. विवेक शुभ अशुभ नैतिक अनैतिक योग्य अयोग्य यातील फरक करण्याची शक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने विवेक होय. माझ्या तरुण मित्रांनो आपल्या जीवनात ज्ञानासारखे पवित्र आणि पूज्यनिय दुसरे काहीही नाही. दोन घास कमी खा पण दररोज किमान दोन तास तरी वाचन करा हा संदेश त्यांनी बहुजन समाजातील सर्व युवकांना दिलेला होता. नाशिक स्कूल मधील भाषण मित्रांनो या देशातील सात कोटी दलित बांधवांचा मी नेता आहे परंतु मला जेव्हा देशातील समाजातील लोकांनी दूर लोटले तेव्हा मला या ग्रंथांनी खऱ्या अर्थाने जवळ केले असे कार्ल मार्क्स यांनी म्हटले होते.
बाबासाहेबांना लहानपणापासून शिक्षणाची प्रचंड मोठी आवड होती परंतु घरची आर्थिक परिस्थिती फार बेताची असल्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये दोन व्यक्तींचे महत्व अधोरेखित करणे गरजेचे आहे त्या दोन व्यक्ती हे त्यांना आधारस्तंभ म्हणून भेटले ज्यांनी त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचे कार्य केले आणि भक्कमपणे आर्थिक आधार देत त्यांच्या पाठीशी उभे राहिले त्यामध्ये त्या दोन व्यक्तींची नावे आवर्जून उल्लेखित करणे गरजेचे आहे त्यामध्ये प्रामुख्याने बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी बडोदा संस्थांच्या वतीने शिष्यवृत्ती जाहीर केली 25 रुपये महिना शिष्यवृत्ती देऊन त्यांना चार वर्षाची पदवी शिक्षण घेण्यासाठी निरंतरपणे मदत करण्याचं कार्य सयाजीराव गायकवाड महाराजांनी केले. आणि पुढे दलितांचे नेते म्हणून परदेशातून शिक्षण घेऊन आल्यानंतर कोल्हापूरचे संस्थानिक छत्रपती शिवरायांचे वारसदार राजर्षी शाहू महाराज यांनी स्वतः बाबासाहेबांना कोल्हापूर संस्थानांमध्ये बोलावून घेऊन त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली आणि कोल्हापूर संस्थानमध्ये त्यांचा यथोचित सन्मान केला आणि त्याही पुढे जाऊन बाबासाहेबांना या सामाजिक चळवळीमध्ये दलितांचा नेता होऊन आपण कार्य करावे त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी घेतली आणि अनेक वेळेला त्यांना आर्थिक मदत करण्याचे कार्यही राजर्षी शाहू महाराजांनी केले त्यामुळे बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने आज भारतीय घटनेचे शिल्पकार होऊन जगातील एक अत्यंत अभ्यासू कायदे पंडित म्हणून नावारूपाला आले. त्यांच्या पाठीमागे अशा महान व्यक्तीनी दिलेले योगदान हेही आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात महात्मा फुलेंना आपला गुरु मानले होते म्हणूनच महात्मा फुले यांच्या घराचा क्रमांक 395 होता आणि गुरुला एक अलौकिक भेट म्हणून त्यांनी या देशाचे संविधान लिहिताना या देशाच्या संविधानामध्ये 395 कलमांचा समावेश करून महात्मा फुलेंना खऱ्या अर्थाने अभिवादन केले होते. त्याचबरोबर 1942 कामगार मंत्री असताना पाटबंधारे ऊर्जा खात्याचे मंत्री असताना भाकरा नांगल धरणाचे काम त्यांनी त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण केलं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक क्षेत्रांमध्ये या देशाच्या विकासासाठी दिलेले योगदान हे खऱ्या अर्थाने या देशातील सर्व भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे म्हणून या महामानवाची जयंती ही सबंध भारतामध्येच नव्हे तर जगातील अनेक राष्ट्रांमध्ये आज मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
या देशातील बहुजन समाजातील युवकांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देताना बाबासाहेब नेहमीच म्हणायचे की अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही अन्याय सहन करू नका आणि त्याचबरोबर ते युवकांना नेहमी साध्या आणि सोप्या शब्दात सांगायचे की ज्ञान हे खऱ्या अर्थाने वाघिणीचे दूध आहे ते जो प्राशन करेल तो व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर स्वतःला ज्ञानसंपन्न बनवा हा संदेश बाबासाहेबांच्या जीवन चरित्रातून आपण घेतला पाहिजे आणि बाबासाहेबांचे विचार हे अंगीकारले पाहिजे बाबासाहेबांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करताना आपण सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मन शुद्ध तुझं ही गोष्ट लाखमोलाची तू चाल पुढे तुला रे आता गड्या भीती कोणाची पर्वा बी कोणाची, वाचनाने मस्तक सुधारते आणि सुधारलेलं मस्तक अनावश्यक तिथे नतमस्तक होत नाही हा विचार आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या जीवन चरित्रातून स्वीकारला पाहिजे जयंतीच्या निमित्ताने या महामानवाला विनम्र अभिवादन.
प्रा. संभाजी नवघरे
मु.अ.विश्वकर्मा प्रा.वि.लातूर
बहिःशाल वक्ता एस.आर.टी.विद्यापिठ नांदेड