दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ( शिरूर ) : सध्या उन्हाच्या झळांनी सर्वच पिकांची अवस्था केविलवाणी झालेली असुन विजेच्या अतिरिक्त भारनियमनाचाही फटका या पिकांना बसत आहे. पाणी असूनही भारनियमनामुळे पिकांची तहान भागवणे अवघड झाले असून, शेतातील पिकांची होरपळ होण्यापूर्वी वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकरी करत आहेत.
शिरसगाव काटा, आलेगाव पागा, मांडवगण फराटा, न्हावरे येथील वीज उपकेंद्रांना शिरूर तालुक्यातील कुरुळी वीज केंद्रातून वीजपुरवठा होतो. काही दिवसांपासून विजेची मागणी वाढल्याने महावितरणकडून अचानक अतिरिक्त भारनियमन केले जात आहे. सध्या कडक उन्हाळ्यात पिकांची अवस्था बिकट असून, पाणी दिल्यानंतरही पिके कोमेजून जातात. अशा अवस्थेत शेतीपंपाना दिवसातून दोन तीन तास वीजपुरवठा होत आहे. त्यात – विजेच्या तांत्रिक अडचणी, लपंडावामुळे पिकांची तहान भागवणे अवघड झाले आहे. परिणामी, चारा पिके, ऊस, मका, मल्चिंगचा वापर करून घेतलेल्या टोमॅटो, कलिंगड, मिरची या पिकांची अवस्था केविलवाणी झाली आहे. महावितरणच्या संबंधित अधिका-यांना ही वीज कधी जाणार कधी येणार याची कल्पना नसल्याचे अधिकारी, कर्मचारी सांगतात. परिणामी, शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
अस्मानी संकटाशी दोन हात करून पिकवलेल्या शेतमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने बळीराजा त्रस्त झाला आहे. आता विजेचा तुडवडा निर्माण होऊन उभ्या राहिलेल्या सुलतानी संकटांना तोंड देता देता बळीराजा अक्षरक्ष: मेटाकुटीला आला आहे. उभी पिके करपून गेल्यावर वीजपुरवठा सुरळीत करणार का, असा संताप शेतकरी व्यक्त करत आहेत.
एकीकडे शेतकरी दिवसा विजेची मागणी करत असताना विजेच्या संकटाने ऐन उन्हाळ्यात बळीराजाच्या समस्या तीव्र केल्या आहेत.पिकांना पाण्याच्या टंचाईने उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक संकट गडद होणार आहे.शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी अजूनही पाणीटंचाई जाणवत नसून पाणी असूनही वीज पुरवठा नियमित होत नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे.