दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती : जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नांदगाव खंडेश्वर तसेच चांदुररेल्वे तहसील कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन पाहणी केली.यावेळी त्यांनी पीक विमा योजना,हर घर जल योजना,संजय गांधी निराधार योजना,निवडणूक विभाग,घरकुलांची कामे तसेच विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील निम्न साखळी प्रकल्पाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी निम्नसाखळी प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या मलकापूर गावाच्या गावकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या.या प्रकल्पामुळे येथील शेती बुडित क्षेत्रात गेली असल्याचे गावकऱ्यांनी यावेळी सांगितले.यासाठी गावकऱ्यांनी मलकापूर गावाचे पुनर्वसन व्हावे,अशी मागणी केली.श्री.सौरभ कटियार यांनी निम्न साखळी प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता पुरुषोत्तम दातीर यांना याबाबत सर्वतोपरी चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत सूचना दिली.
त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी गोळेगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली.या गावात पूरामुळे पुलाचे नुकसान झालेले आहे.यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधिताना याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले.उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी,नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी,चांदुररेल्वे तहसीलदार पुजा माटोडे,गट विकास अधिकारी प्रकाश नारकर,निरीक्षण अधिकारी शितल राठोड तसेच संबंधित विभागाचे अधिकारी,कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात महसूल सप्ताहानिमित्त ‘माणूसकीची भिंत’या उपक्रमाचे उद्घाटन श्री.सौरभ कटियार यांनी केले.तसेच महसूल सप्ताहानिमित्त आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित रांगोळी स्पर्धेचीही पाहणी केली.तहसील कार्यालय परिसरात कडूलिंबाचे रोप लावून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.श्री.सौरभ कटियार यांनी येथील नगर पंचायत कार्यालयालाही भेट देऊन पाहणी केली.
जिल्हाधिकारी यांनी चांदुर रेल्वे येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयास भेट पाहणी केली.त्यानंतर तहसील कार्यालय येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.या रक्तदान शिबिरात शासकीय अधिकारी,कर्मचारी तसेच नागरिकांनी रक्तदान केले.मालखेड या पर्यटन स्थळाची तसेच चिरोडी येथील सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेची पाहणी केली.