दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:पावसाळा सुरू झाला की हमखास
पसरणारी संसर्गजन्य साथ म्हणजे डोळे येणे होय. घरातील एखाद्याचे डोळे आले की कुटुंबातील संपूर्ण सदस्यांना याची लागण होते. डोळ्यांच्या साथीने सारेच त्रस्त आहेत.
याचा सर्वाधिक फटका देगलूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत असून, याचा परिणाम शाळेतील उपस्थितीवर झाला आहे. मात्र, आरोग्य विभाग याबाबत झोपेत असून कुठल्याच उपाययोजना करताना दिसून येत नाही.डोळ्यांच्या व्हायरससाठी पावसाळा पोषक ऋतू मानला जातो. डोळ्याला संसर्ग होणे ते लक्षणे दिसण्याचा काळ हा तीन ते चार दिवसांचा असतो.
साधारणतः प्रारंभी एक डोळा खुपतो आणि नंतर लाल होतो. याचा संसर्ग दुसऱ्या डोळ्यालाही होतो. सर्वसाधारणपणे डोळे चांगले होण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी लागतो. औषधोपचारा नंतर डोळे पूर्ववत होतात. पण दुर्लक्ष केल्यास बुबुळाला संसर्ग होतो आणि परिस्थिती गंभीर होते.
सध्या देगलूर तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये डोळे येण्याची साथ वेगाने पसरत आहे. एका विद्यार्थ्याला लागण झाल्यानंतर संपूर्ण वर्ग कचाट्यात सापडण्याची शक्यता असते. मात्र, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालुका आरोक्य केंद्राकडून डोळ्यांची साथ आटोक्यात आणण्यासाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.डोळे येण्याची लक्षणे
डोळ्याचा पांढरा भाग लालसर, गुलाबी होणे
डोळ्यातून पाणी येणे, जळजळ करणे, खाज सुटणे जास्त प्रमाणात म्यूकस निघणे डोळ्यात खडे गेल्यासारखे वाटणे, खुपणे सकाळी उठल्यावर पापण्यांच्या केसावर चिकट पदार्थ जमा होणे
पापण्यांना सूज येणे.
दृष्टीक्षेपात अडथळे निर्माण होणे. शिक्षण विभागाकडून लेखी सूचना नाहीत.
देगलूर शहरी भागासह ग्रामीण भागात बहुतांश विद्यार्थ्यांना सध्या सर्दी, खोकला, तापासह डोळे येण्याचा त्रास सुरु झाला आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने एकाला लागण झाल्यास इतर विद्यार्थीही बाधित होत आहेत.
प्रकृती बरी नसलेल्यांनी शाळेत येऊ नये, असे आवाहन शिक्षक व मुख्याध्यापक करत आहेत. शाळा पातळीवर निर्णय घेतला जात असला तरी प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाकडून या संदर्भात लेखी सूचना अद्याप प्राप्त झाल्या नसल्याचे शाळांकडून सांगण्यात आले. परिणामी शिक्षक व मुख्याध्यापक अडचणीत सापडले आहेत. . साथ नसताना
आरोग्य विभागाचे दौरे.
विद्यार्थ्यांना जेव्हा कोणताही आजार नसतो तेव्हा शाळेत आरोग्य विभागाचे अधिकारी दौरे करतात. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही केली जाते.
पण पावसाळ्यात ग्रामीण भागात साथरोगांचा प्रादुर्भाव वाढला असताना प्राथमिक आरोग्य विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे. तसेच जिल्हा परिषदेचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग अनभिज्ञ असून त्यांनी शाळांना याबाबत कुठल्याही सूचना केलेल्या नसल्याचे शाळांचे म्हणणे आहे. या संसर्गजन्य रोगावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाने देगलूर तालुक्यातील प्रत्येक शाळेवर आरोग्य शिबिर भरणे गरजेचे आहे अशी जनतेतून चर्चा होताना दिसत आहे . तरी प्रशासनाने या विषयाकडे लक्ष घालून लवकरात लवकर शाळेवर आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात यावी .