दै.चालु वार्ता
जिल्हा प्रतिनिधी बीड अंबाजोगाई
अंबाजोगाई (प्रतिनिधी):– अंबाजोगाई शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर शासकीय जमीन आहे. त्यापैकी काही जमिनीवर गेली अनेक वर्षांपासून लोकांनी अतिक्रमण करून तिथे आपला संसार थाटला आहे. बऱ्याच ठिकाणी पक्की घरे बांधून लोक वास्तव्य करत मोठी वस्ती निर्माण केली आहे . या गावठाण व अतिक्रमित जमिनीवरील घरांची नोंद शासनाने आपल्या दप्तरी घेऊन तेथील सर्व नागरिकांना त्या त्या घरांची नोंद मालकीत घेऊन त्यांना शासनाच्या घरकुल योजनेसह अन्य योजनांचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी एका निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती तसेच मुख्याधिकारी नगर परिषद यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
नुकतेच महाराष्ट्र शासनाने गावठाण आणि शासकीय जमीनीवरील निवासी अतिक्रमण कायम करून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार अंबाजोगाई तालुक्यातील पंचायत समिती आणि नगर पालिका हद्दीतील गावठाण आणि शासकीय जमीनीवरील निवासी अतिक्रमण कायम करून घेवून त्यांची नोंद मालकीत घेवून शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करावी व त्यांना घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा वत्यांचे आपले स्वतःचे व हक्काचे घर असावे हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावा अशी देखील मागणी याप्रसंगी राजकिशोर मोदी व त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. याआधी देखील नगराध्यक्ष असतांना राजकिशोर मोदी यांनी भोगवट्यातील जमीन मालकीत घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र शासनाच्या काही नियम व धोरणानुसार ते शक्य झाले नव्हते. याचाच धागा पकडून आज शासनाकडे पुनः तीच मागणी करण्यात आली आहे .
सादर केलेल्या निवेदनाची दखल घेवून संबंधितांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश तात्काळ संबंधित अधिकारी वर्ग व कर्मचाऱ्यांना देण्यात यावेत अशी विनंती देखील उपजिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तानाजी देशमुख , माजी नगरसेवक,महादेव आदमाने,अमोल लोमटे, कचरूलाल सारडा, सुनिल वाघळकर , तौसिफ सिद्दीकी, आकाश कऱ्हाड, गणेश मसने, शुभम लखेरा,सचिन पायके, अमजद पठाण,संजय साळवे,गोविंद पोतंगले ,लक्ष्मण करनर , सुनील व्यवहारे,खलील जाफरी, सचिन जाधव, कैलास नाना कांबळे ,महेबुब गवळी , वजीर शेख, दत्ता सरवदे,अंकुश हेडे ,सय्यद ताहेर,शेख शाहिद, पठाण असदखान,महेश कदम,वजीर शेख,बालासाहेब आदमाने,रफिक गवळी, जावेद गवळी, धम्मपाल सरवदे, शरद काळे, मतीन ज़रगर आदी जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत .