दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड(कंधार) :- कल्हाळी येथे मराठवाडा मुक्ती संग्रामातील ३५ हुतात्म्यांचे स्मारक उभारणीकरीता शासन निर्णय काढण्याकरीता वेळोवेळी शासनाशी पत्रव्यवहार करुन त्याचा पाठपुरावा करुन जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली ३५ हुतात्म्यांचे स्मारक उभारणी समिती गठीत शासन निर्णय काढण्याकरीता कल्हाळी येथील रहिवाशी तथा स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य डॉ. उत्तमराव सोनकांबळे यांनी केलेल्या यशस्वी प्रयत्नाबद्दल त्यांचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंधारचे तहसीलदार राम बोरगावकर हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये कंधारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, नायब तहसीलदार, कंधार परिक्षेत्राचे वन अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक माधवराव कंधारे, नाईक घराण्याचे वारसदार डॉ. नरेंद्र नाईक यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात मौजे कल्हाळी येथे १९४७- ४८ साली मोठा रणकंदन झाला. सशस्त्र लढ्याचे सुत्रधार हुतात्मा वीर अप्पासाहेब नाईक यांच्यासह ३५ हुतात्मे यात शहीद झाले.
या ३५ हुतात्म्यांना रझाकार व निजामी पोलिसांनी एकाच सरणावर अग्नी दिला. अशा ऐतिहासिक गावामध्ये भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी मागील दोन वर्षापासून डॉ. उत्तमराव सोनकांबळे यांनी सातत्यपूर्ण शासन दरबारी लावून धरली. त्यामुळे शासनाने शासन निर्णय क्रमांक ः स्मारक-२०२१/(प्र.क्र. १२१)/योजना-११ दि. २६ ऑगस्ट २०२१ रोजी काढून स्मारक उभारणीसाठी मराठवाड्याचे सुपूत्र क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री ना. संजय बनसोडे यांच्याकडून स्मारक उभारणीसाठी शिफारस घेऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिफारस पत्र देऊन त्यांच्यासोबत मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यातील कल्हाळी येथील लढ्याची पूर्ण माहिती देऊन चर्चा करुन कल्हाळी येथे ३५ हुतात्म्यांचे भव्य स्मारक ज्यामध्ये भव्य सांस्कृतिक सभागृह,
व्यायाम शाळा, वाचनालय, दवाखाना, संग्रहालय तसेच ३५ हुतात्म्यांचे अर्धाकृती पुतळे व त्यांचे साहित्य जे की भरमार बंदुका, बर्चे, कुर्हाडी, भाले, गोफणगुंडे, दारुगोळा, तलवारी इत्यादी लढ्यातील साहित्याचे संग्राहालय. ७५ फुट उंचीचा तिरंगा ध्वजस्तंभ, भव्य विजयस्तंभ, स्मारकाला सुरक्षा भिंत व सुशोभीकरण करुन पर्यटन क्षेत्राचा दर्जा द्यावा अशीही चर्चे दरम्यान मागणी केली.
सदर मागणीची पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले.
या पार्श्वभूमीवर डॉ. उत्तम सोनकांबळे यांचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी सांगतानिमित्त कल्हाळी येथे दि. १५ सप्टेंबर रोजी आयोजित भव्य कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.